धरणीची व्यथा | मराठी कविता | कवी प्रशांत सर

धरणीची व्यथा | मराठी हृदयस्पर्शी कविता 

अगं धरणी माई, का गं रडी हळवी?
तुझ्या कुशीतला हिरा, कुणी चोरला चोरवी ।। 

कापी वनराई सारी, झाली उघडी पायवाट, 
सुनी पाखरा घरटी, रडी नभी दिस-रात ।। 

धारा तुझ्या कोरड्या, पाणी झालं आक्रंदन, 
थेंब थेंब सांडीतसे, जणू तुझं जीवदान।। 

शेतावरी पडी राख ,कष्टकऱ्याचा तु श्वास, 
भाकरीही कडू आता, गोड हरला सुवास ।। 

अरे माणसा तु थांब, किती करशील घाव? 
तुझ्याच पायाखाली, जगण्याचा हा ठाव ।। 

धरणी म्हणे सांभाळ रे, नको करू रे छळ,
माझ्याविना शून्य तुही,हा निसर्गाचा खेळ ।।

                         - कवी प्रशांत सर (संगमनेरकर) ©

(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)
रणीची व्यथा मराठी कविता – निसर्गाचा आक्रोश, वृक्षतोड आणि पर्यावरण संवेदन दर्शवणारी प्रतिमा

भावार्थ :
             या कवितेत मी धरणीला एक जिवंत, संवेदनशील माय म्हणून पाहतो आणि तिच्या वेदनेला माझ्या शब्दांत व्यक्त करतो. वृक्षतोड, नष्ट होत चाललेली वनराई आणि कोरड्या पडलेल्या नद्या या सगळ्या गोष्टी मला तिच्या आक्रोशाचे प्रतीक वाटतात. माणसाच्या अतिरेकामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे, ही जाणीव मला खोलवर अस्वस्थ करते. शेतकऱ्याच्या कष्टांवर पडलेली राख आणि कडू झालेली भाकरी हे केवळ चित्र नसून, माझ्या अंतर्मनातील वेदना आहेत. म्हणूनच मी माणसालाच थांबण्याचा इशारा देतो. कारण धरणीशिवाय त्याचं अस्तित्वही अपूर्ण आहे. ही कविता माझ्या मनातील निसर्गाविषयीची आर्त हाक आहे.    

📌 मी कोण?

हा प्रश्न तुम्हाला पडला असेल,

तर खालील लिंकवर क्लिक करून वाचा

📖 येथे क्लिक करून वाचा

माझ्याशी जोडलेलं रहा

YouTube | Instagram | Facebook

(खालील आयकॉनवर क्लिक करा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने